मीटर बसविण्यास विरोध केल्यास नळजोड बंद करणार   

पाणीपुरवठा विभागाचा इशारा

पुणे : महापालिका प्रशासनाने पाणी मिटर बसण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे मीटर बसविण्यास नागरिकांकडून तसेच सोसायट्यांकडून विरोध केला जात आहे. मीटर बसविण्यात येत नसल्याने पाणी गळती शोधणे कठीण असून, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे एएमआर पाणी मीटर बसविण्यास विरोध केल्यास थेट नळजोड बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. हा इशारा देणारे पत्र पाणीपुरवठा विभागाकडून देण्यास सुरुवात केली आहे.
 
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण साखळीत मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. त्यानंतर देखील पुणे महानगरपालिकेला शहरातील विविध भागांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याने महापालिकेला जलसंपदा विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे, तसेच पाणी जपून वापरण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. पाणी गळती शोधून पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेनुसार मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे. आता पर्यंत एक लाख ८० हजार मीटर बसविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत, त्या भागातील पाणी गळती शोधण्यास तसेच पाण्याचा अधिक वापर केल्याचे समोर येत आहे. यामुळे पाणी वापरावर तसेच गळतीवर नियंत्रण आणणे विभागाला शक्य होत आहे. यामुळेच ज्या भागाता आता मीटर बसविण्यास विरोध केला जाईल, त्यांचे थेट नळजोड बंद करण्याची कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.  
 
पालिका हद्दीतील सर्व ग्राहकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यास्तव प्रथम वेळी बसविण्यात येणार्‍या मीटरचा खर्चपालिकेमार्फत करण्यास पालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली आहे. त्यानुसार पालिकेमार्फत नवीन एएमआर पद्धतीचे स्मार्ट पाण्याचे मीटर्स बनविण्यात येत आहेत. सदरच्या मीटरचा खर्च हा पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. मीटर हा आपल्या मिळकतीमध्ये आपल्या सुचनेनुसार योग्य ठिकाणी बसविण्यात येणार आहे. मीटर सुस्थितीमध्ये व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असून मीटरला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यामुळे तुटल्यास, नादुरुस्त झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्राहकावर असणार आहे.
 
पालिकेमार्फत सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा व नागरिकांना प्रत्यक्ष होणारा पाणीपुरवठा यामध्ये विसंगती येत असल्याने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीपुरवठा न होणे यासारख्या तक्रारी वारंवार येत असतात तसेच होणार्‍या पाणीपुरवठ्यामध्ये गळतीचे प्रमाण किती आहे, हे तपासणेही आवश्यक आहे. पाणीपुरवठा पुरेसा आहे, अगर कसे ? हे तपासण्यासाठी सद्यस्थितीत कोणतीही यंत्रणा नसल्याने पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळीच व तातडीने करणे अडचणीचे होत आहे. यास्तव पालिकेने समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्राधान्याने अस्तित्वातील नळ जोडास एएमआर मीटर बसविणे व मीटरद्वारे दैनंदिन पाण्याचे मोजमाप करणे त्याच बरोबर दैनंदिन वापर होणाच्या पाण्याची मोजदाद करून त्याची मानांकनानुसार तुलना करणे, त्याद्वारे पुरेसा पाणीपुरवठा करणे यामुळे निश्चित प्रमाण ठरविणे शक्य होणार आहे.
 
समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सध्या प्राधान्याने अस्तित्वातील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मिळकतीमधील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी विरोध होत असल्यामुळे अद्याप मीटर बसविण्यात आला नसल्यामुळे साठवण टाकीवरून पुरविण्यात येणार्‍या पाण्याचे मोजमाप करणे व गळती शोधणे अडचणीचे होत आहे. पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक असून, त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसविणे जरुरीचे आहे. मिळकतीमधील नळजोडावर एएमआर मीटर बसविण्यासाठी सहकार्य करण्यात यावे अन्यथा यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता नाईलाजास्तव आपला नळजोड बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. असे नागरिकांना तसेच सोसायट्यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles